पुसद प्रतिनिधी –
नोकरीच्या काळात समाजसेवा करता येत नाही असे म्हटले जाते. त्यातच बॉर्डर पोलिस दलातील जवानांना तर ते शक्यच नसते परंतु प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका जवानाने इतर चार सहकाऱ्यांच्या मदतीने चक्क दिल्लीत ‘गरजवंतांना अन्नदान’ या सेवेचा शुभारंभ मराठी नव वर्षाला म्हणजेच गुढीपाडव्याला करुन देशसेवेबरोबरच समाजसेवेची गुढी उभारुन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
जेवलेल्यांना जेऊ घालण्यापेक्षा, उपाशीपोटी असणार्यांना,भुकेल्यांना दोन घास अन्नाचे भरविने हे खरे अन्नदान असल्याची अनुभूती पुसद तालुक्यातील बोरगडी येथील लक्ष्मीनगरातील रहिवासी असलेले वैभव दत्तराव गोभे (रॉयल फौजी) हे इंडो तिबेटीयन पोलिस दलात लद्दाखमधील कारकोरम दरा पासून ते अरुणाचल प्रदेशातील तवांग ला पर्यंत ३४८८ किलोमीटर लांबीच्या भारत- चीन सीमेवर गेल्या १० वर्षांपासून शौर्य—दृढता—कर्म निष्ठा हे ब्रीद घेऊन सेवेत तैनात आहेत.
सध्या त्यांची दिल्ली येथील पोलीस मुख्यालयात बदली झाल्यानंतर ते जानेवारी महिण्यात सुट्टीवर आले असता, त्यांनी पुसद येथील माणूसकीची भिंतीचे गजानन जाधव व शिवप्रभा ट्रस्टचे विश्वस्त परशुराम नरवाडे यांच्या मार्गदर्शनात पुसद येथे सुरु असलेले भूकेल्यांना अन्नदान,गरजू व आपत्तीग्रस्तांना मदत आदींची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. व आपणही आहो तिथे समाजसेवेचे कार्य करावे असा विचार मनात आणला. वडील दत्तराव गोभे,पत्नी अंजली गोभे आणि कुटुंबीयां समोर विचार मांडला तसेच त्यांचे समवेत असलेले विदर्भातील जवान मिलन जाधव त्यांची पत्नी आरती जाधव, जवान सोपान टाले त्यांची पत्नी भाग्यश्री टाले (रा. पातुर जि.अकोला) व सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले जवान सचिन सावंत त्यांच्या पत्नी पायल सावंत आणि बीएसएफचे जवान राजेश दळवे रा. तळणी तालुका. हदगाव जि.नांदेड यांच्या समोरही मांडला. व त्याला मूर्त स्वरुप देण्यासाठी गुढीपाडव्याचा मूहुर्त ठरविला.सर्व कुटुंबीयांनी दिल्लीतील संगमविहार या भागातील गरजूंसाठी मराठी नववर्षदिनी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिनी माणूसकीची भिंत स्थापन केली. व अत्यंत गरजू व भूकेल्यांना गोडभाताचे अन्नदान करण्याला सुरवात करुन देशसेवेबरोबर समाजसेवेची गुढी उभारली. महाराष्ट्रातील ही पाचही कुटुंबे स्वत: पदरमोड करुन आठवड्यातील सुट्टीच्या दिवशी म्हणजेच दर रविवारी या भागातील ५० ते १०० भुकेल्यांना पुरेल एव्हढे भोजन तयार करुन अन्नदान करणार आहेत.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीसारख्या मेट्रो शहरातही अनेकजन भूकेले असतात ह्याची माहिती सीमा पोलिस दलातील जवान वैभव गोभे यांनी मिळवून पुसदच्या माणूसकीच्या भिंतीच्या समाजसेवेचा झेंडा दिल्लीत फडकविल्याबद्दल पुसद येथील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले असून मदतीचा हात देण्याचे संदेश सोशल मिडीयावर झळकत आहेत.
सीमा पोलिस दलाच्या सेवेत असल्याने अतिशय शिस्तीत राहावे लागते, त्यामुळे सेवेतून वेळ काढणे शक्य होत नसल्याने हक्काच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी अन्नदानासाठी वेळ राखीव ठेवला आहे. भविष्यात अनेक सहकारी जोडले गेल्यास किमान एक दिवस आड अन्नदान करण्याचा त्यांचा मानस आहे.
बुरो रिपोर्ट – रॉ भारत न्यूज़




