Monday, April 20, 2026
Google search engine
Homenewsलोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी....!

लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी….!

पुसद (प्रतिनिधी):
पुसद शहरातील एसटी बस स्थानक परिसरात भीम टायगर सेनेच्या वतीने लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक ऐक्य, संघर्षमय जीवन आणि प्रेरणादायी साहित्यिक कार्याची उजळणी करत उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर केला.

या जयंती कार्यक्रमाची सुरुवात भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली. उपस्थित मान्यवरांनी एकमुखाने बाबासाहेबांना अभिवादन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण केले.

यानंतर मंचावर उपस्थित विष्णू सरकटे, जनार्धन झोडगे व अण्णा दोडके यांनी अण्णाभाऊ साठे व लहुजी साळवे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विविध पैलूंवर सखोल विचार मांडले.

कार्यक्रमात बोलताना विष्णू सरकटे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “अण्णाभाऊंचे साहित्य हे फक्त करमणुकीपुरते मर्यादित नसून, ते शोषित, वंचित, उपेक्षित समाजासाठी आशेचा किरण ठरले. त्यांच्या कथा, गीते, पोवाडे हे केवळ शब्द नाहीत, तर जनतेच्या वेदना, आक्रोश आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहेत.”

जनार्धन झोडगे यांनी अण्णाभाऊंच्या जीवनप्रवासाचा इतिहास मांडताना सांगितले की, “अण्णाभाऊ साठे हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढले, पण शिक्षण नसतानाही त्यांनी स्वानुभवातून साहित्य रचले आणि ते जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांच्या लेखणीतून सामाजिक विषमतेचा प्रखर विरोध दिसून येतो.”

अण्णा दोडके यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवे यांच्या सामाजिक योगदानाचे स्मरण करत सांगितले की, “सामाजिक क्रांतीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे योगदान हे अनमोल आहे. त्यांनी लेखणीच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण केली आणि समानतेच्या लढ्याला नवी दिशा दिली.”

विशेषतः कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार मांडताना सांगितलं की, “अण्णाभाऊंचं संपूर्ण आयुष्य हे वंचित समाजाच्या उभारणीसाठी वाहिलं गेलं होतं. त्यांनी जे लिहिलं ते आजही समाजाला दिशा देतंय. त्यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन आपण एक नवा, समतोल समाज घडवू शकतो.”

या प्रेरणादायी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तराव कांबळे यांनी ओघवत्या शैलीत केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला व कार्यक्रमाची शिस्तबद्ध मांडणी केली. कार्यक्रमाच्या शेवटी रविकांत शिंगणकर यांनी उपस्थितांचे आभार मानून पुढील काळातही अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये प्रभाकर खंदारे, नारायण दोडके, संजय शेळके, गजानन बोखारे, दिलीप धुळे, बळीराम दोडके, अशोक बनसोडे, शुभम दोडके, सीमा आसोले, डॉन कांबळे यांचा समावेश होता. तसेच भीम टायगर सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या वृत्तांकनासाठी अनेक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. मारोती भस्मे, विनोद कांबळे, अरुण बरडे, मोहम्मद हनीफ या पत्रकारांनी कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत विविध माध्यमांद्वारे जनतेपर्यंत या कार्यक्रमाची माहिती पोहोचवली.

या कार्यक्रमातून एकच संदेश स्पष्टपणे समोर आला – अण्णाभाऊ साठे यांचा संघर्ष, विचारधारा आणि साहित्य हा फक्त इतिहासाचा भाग नसून, तो आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरू शकतो. भीम टायगर सेनेने घेतलेले हे पाऊल केवळ सांस्कृतिक नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचेही प्रतीक ठरते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत असून, अशाच प्रेरणादायी उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य आणि जनजागृतीला बळ मिळेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

– अरुण बरडे, DD NEWS PUSAD 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments