बेलगव्हाण, दि. 9 ऑगस्ट 2025 –
८ ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस 9 ऑगस्टच्या सकाळी सुमारे 9 ते 10 वाजेपर्यंत अखंड कोसळत राहिला. तब्बल 10-12 तास चाललेल्या या पावसाने यवतमाळ–नांदेड रेल्वे मार्गावरील भव्य बोगदा प्रकल्पाला जबरदस्त फटका बसला. हे काम Max Infra Company तर्फे सुरू असून, प्राप्त प्राथमिक माहितीनुसार या आपत्तीमुळे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.
दोन ते तीन किलोमीटर लांबीचा बोगदा सध्या बांधकामाधीन आहे. मात्र, पावसाच्या तडाख्याने बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. परिणामी, संपूर्ण यंत्रसामग्री, बांधकाम साहित्य आणि महत्त्वाची उपकरणे पाण्यात बुडाली आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की कामावर असलेली मशिनरी अद्यापही पाण्यातच अडकून आहे, त्यामुळे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.
कामकाजासाठी कंपनीने तयार केलेला तात्पुरता नाला देखील पावसाच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. त्यामुळे परिसरातील वाहतूक मार्ग बंद झाला असून, मजूर वर्ग, कामगार तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तज्ञांच्या मते, बोगद्यातील पाणी उपसण्याची आणि नाल्याची दुरुस्ती करण्याची कामे पूर्ण होईपर्यंत प्रकल्प पुन्हा सुरू होणे अत्यंत कठीण आहे. स्थानिक प्रशासनानेही परिस्थितीची पाहणी सुरू केली असून, नुकसानभरपाई आणि दुरुस्तीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



