पुसद – शहरातील संभाजीनगर येथील बुद्ध विहार प्रांगणात जन संघर्ष समितीची जाहीर सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे संस्थापक अध्यक्ष शाहूराज माने होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख इरफान, समितीचे वरिष्ठ सल्लागार आनंदराव नरवाडे, जिल्हाध्यक्ष उमेश लोखंडे, तालुकाध्यक्ष श्रीनिवास पडघने, तसेच डी. के. जाधव, संभाजीराव कदम, सय्यद सादिक, शेख जावेद आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समृद्धी जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पीडित गुंतवणूकदारांच्या न्यायासाठीचा लढा लढविण्यासाठी जन संघर्ष समिती कार्यरत आहे. त्याच अनुषंगाने पुसद येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती.
सभेला संबोधित करताना शाहूराज माने यांनी न्यायालयाच्या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, निकालात असे म्हटले आहे की समृद्ध जीवनचा कारभार केवळ नऊ राज्यांमध्ये असून फक्त दोन लाख गुंतवणूकदार आहेत. मात्र प्रत्यक्षात ही सोसायटी सतरा राज्यांमध्ये कार्यरत असून वीस लाखांहून अधिक गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये अडकलेले आहेत. गोरगरीब व सामान्य गुंतवणूकदारांचे रक्ताचे पैसे परत मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे. न्यायालयाच्या निकालाविरोधात जनहित याचिका दाखल करू आणि न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असे ठाम वक्तव्य त्यांनी केले.
या सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उमेश लोखंडे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनीही सभेला मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख इरफान यांनी समितीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सभेचे सूत्रसंचालन युवराज चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीनिवास पडघने यांनी मानले.
या सभेच्या यशासाठी आनंदराव नरवाडे, उमेश लोखंडे, श्रीनिवास पडघने, भास्कर बनसोड, विठ्ठल इंगळे, पंडित घाडगे, अनिल कांबळे, संतोष गायकवाड, किसन कांबळे, रमेश ढेंबरे, प्रल्हाद खडसे, अनिल राठोड यांनी पुढाकार घेतला. सभेला शेकडोंच्या संख्येने पीडित गुंतवणूकदार उपस्थित होते. त्यामध्ये मधुकर धुळध्वज, प्रकाश गुळवे, साहेबराव कांबळे, शंकर चोपडे, उमेश लोंढे, किशोर चंद्रवंशी, शेख जाफर, सय्यद शाबुद्दीन, अरविंद जाधव, सुमेध ठमके, विमल जोगदंडे, शालिनी आळणे, कांता मुनेश्वर, वर्षा मनवर, भाग्यश्री शेळके, मंदा खंदारे, अनुसया गुळवे, जैनाबी शेख गुलाब, अनुसया विनकरे, रिजवाना अली यांचा समावेश होता.



