ईसापुर धरणात मासेमारी प्रकल्पाचा शुभारंभ : ग्रामीण भागासाठी रोजगाराची नवी दिशा
ईसापुर (ता. पुसद) – महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकावरील मोठे धरण असलेल्या ईसापुरमध्ये आता रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय सुरू होतोय. ३० जून ते २ जुलै २०२५ या कालावधीत या भव्य जलाशयात ३० ते ३५ लाख विविध प्रजातींच्या माशांची बीज सोडण्यात आली असून, त्यामुळे मासेमारी उद्योगाला चालना मिळणार आहे.
या उपक्रमात राहू, मिरगल, शिपर्नस, सिल्वर अशा उच्च बाजारमूल्य असलेल्या प्रजातींचा समावेश आहे. हा मासेमारी प्रकल्प केवळ जलजैविक समतोलासाठीच नव्हे तर धरणालगतच्या गावांतील युवकांसाठी रोजगाराची मोठी संधी ठरणार आहे.
धरणाचे ठेकेदार अब्दुल मोहम्मद नाशीर खान यांनी आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून मासे बीज आणून ते जलाशयात सोडण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले आहे. त्यांनी स्थानिक मत्स्य व्यवसायाला हातभार लावण्यासाठी या प्रकल्पात विशेष रस घेतला.
या कामगिरीवर देखरेख करणारे सुपरवायझर विनायक थावरा राठोड यांनी माहिती देताना सांगितले,
“आम्ही सर्व सेंटरची प्रत्यक्ष पाहणी केली. मासे बीज सोडताना लक्षात आले की, यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळणार असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.”
या उपक्रमामुळे ईसापुर परिसरात आर्थिक घडामोडींना वेग येणार असून, ग्रामीण तरुणांना मत्स्यव्यवसायात उतरून स्वावलंबनाची संधी मिळणार आहे. हे धरण केवळ सिंचनासाठी नव्हे, तर ग्रामीण विकासाचा कणा बनण्याची तयारी करत आहे.



